Loading ...

Life & Law

RECENT NEWS

विवाह नोंदणी: आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया (Marriage Registration: Required Documents and Procedure)

विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. त्याचप्रमाणे विवाहाची नोंदणी करणे देखील तितकेच आवश्यक आहे. महाराष्ट्रात, विवाह नोंदणी ही केवळ औपचारिकता नसून, ती कुटुंबातील हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आणि शासकीय कागदोपत्रकी पुराव्यासाठी  उपयुक्त ठरते.

हा लेख  महाराष्ट्रातील विवाह नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती देण्यासाठी आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्रे, नोंदणीची प्रक्रिया, ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्याय, तसेच विशेष विवाह कायद्याचे (Special Marriage Act) स्पष्टीकरण दिले आहे. वाचकांना या प्रक्रियेची सुलभ आणि अचूक माहिती मिळावी, हा या लेखाचा मुख्य हेतू आहे.

विवाहानंतरची नोंदणी (Post-Marriage Registration Process)

1. विवाहानंतर नोंदणीकरिता अर्ज सादर करणे (Submission of Application)

  • कोण अर्ज करू शकतो: वधू-वर स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधी.
  • नोंदणी कार्यालय निवड: विवाह  ज्या ठिकाणी झाला, तेथील किंवा वधू-वरांच्या राहत असलेल्या ठिकाणाच्या नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल करू शकता.
  • अर्ज : अर्जाची प्रत मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करता येतो किंवा कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन फॉर्म मिळतो.https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. 
  • आवश्यक कागदपत्रे:
    • वधू-वराचे फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स).
    • वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला).
    • रहिवासाचा पुरावा (रेशन कार्ड, वीज/टेलिफोन बिल, किंवा पासपोर्ट).
    • विवाह पत्रिका किंवा उपलब्ध नसल्यास प्रतिज्ञापत्र.
    • घटस्फोटाचे आदेश (घटस्फोटीत असल्यास) किंवा मृत्यू प्रमाणपत्र (विधवा/विधुर असल्यास).
    • वधू-वराचे पाच एकत्रित फोटो आणि साक्षीदारांसोबतचे दोन फोटो.
  • प्रमुख प्राधिकरण: उपनिबंधक (Registrar of Marriages):

उपनिबंधक हा विवाह नोंदणीसाठी प्रमुख अधिकारी आहे. उपनिबंधक विविध स्तरांवर कार्यरत असतात आणि सामान्यतः महानगरपालिका, नगरपालिका, किंवा पंचायत स्तरावर उपलब्ध असतात.

             उपनिबंधकाकडे सेवा:

  • हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत विवाहाची नोंदणी.
  • निकाह झाल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज.
  • ख्रिश्चन, पारसी, आणि इतर धर्मीयांसाठी विवाह नोंदणी

स्थान: स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका किंवा पंचायत कार्यालयात उपनिबंधक उपलब्ध असतो.

2. शुल्क भरणे (Payment of Fees)

विवाहानंतर अर्ज सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क लागू होईल:

  • 90 दिवसांच्या आत अर्ज सादर केल्यास: रु. 50/-
  • 90 दिवसांपासून 1 वर्षाच्या आत अर्ज सादर केल्यास: रु. 100/-
  • 1 वर्षानंतर अर्ज सादर केल्यास: रु. 200/-

3. भेटीची वेळ घेणे आणि पडताळणी (Scheduling and Verification)

  1. नोंदणीसाठी भेटीची  विनंती करा.
  2. वधू, वर आणि  साक्षीदार भेटीच्या  दिवशी नोंदणी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहतील.
  3. भेटीच्या  वेळी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

4. मंजुरी किंवा नकार (Approval or Rejection)

  1. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याने नोंदणी मंजूर केली, तर:
    • विवाह  प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात तयार केले जाईल.
    • प्रमाणपत्र वधू-वरास ईमेल/SMS द्वारे कळवले जाईल.
    • एकच प्रत प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा मिळेल.
  2. नोंदणी नाकारल्यास:
    • नोंदणी नकार आदेश दिला जाईल
    • सॉफ्टवेअरमध्ये अपील करण्याची सोय असेल.

5. अपील प्रक्रिया (Appeal Process)

  1. नोंदणी नाकारल्यास फॉर्म G द्वारे विवाह ब्युरो/राज्य नोंदणी अधिकाऱ्यांकडे अपील करता येईल.
  2. राज्य नोंदणी अधिकाऱ्यानेही नकार दिल्यास, संबंधित जिल्हा न्यायालयात अपील करता येईल.

6. डिजिटल नोंदणी व रेकॉर्ड्स (Digital Records)

  1. अंतिम विवाह  प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात तयार केले जाईल.
  2. सर्व नोंदणी रेकॉर्ड्स फॉर्म J मध्ये जतन केली जातील.

विशेष विवाह कायद्याअंतर्गत नोंदणी (Registration under Special Marriage Act)

विशेष विवाह कायदा काय आहे?

विशेष विवाह कायदा, 1954 हे आंतरधर्मीय (Interfaith) आणि आंतरजातीय (Inter-caste) विवाहांसाठी लागू असलेला एक धर्मनिरपेक्ष कायदा आहे. या कायद्याच्या अंतर्गत, दोन व्यक्ती वेगवेगळ्या धर्मांच्या असतानाही त्यांच्या विवाहाची कायदेशीर नोंदणी केली जाऊ शकते.

विशेष विवाह कायद्याअंतर्गत नोंदणी प्रक्रिया

1. अर्ज सादर करणे:

विवाहित जोडप्याने विवाह नोंदणीसाठी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज करावा  लागतो. अर्जामध्ये दोन्ही व्यक्तींचे वैयक्तिक तपशील, वय, ओळख, पत्ता, आणि विवाहाची इच्छाशक्ती असलेले माहिती समाविष्ट असते. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. https://adjudication.igrmaharashtra.gov.in/eMarriage2.0/ या वेबसाइट जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

2. आवश्यक कागदपत्रे:

अर्ज सादर करताना जोडप्यांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी  लागतात जसे की :

  • वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा सोडपत्र).
  • ओळखपत्र (आधार कार्ड, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा.
  • किमान दोन साक्षीदारांची माहिती आणि त्यांच्या ओळखीची तपासणी.

3. नोटीस कालावधी:

अर्ज सादर केल्यानंतर, नोंदणी कार्यालय 30 दिवसांसाठी सार्वजनिक नोटीस देतो. या नोटीसमध्ये विवाहाची माहिती दिली जाते आणि इतर लोकांना विवाहावर हरकत ठेवण्याची संधी मिळते. ही नोटीस किमान 30 दिवस सार्वजनिक ठिकाणी लावली जाते.

4.हरकतींचे व्यवस्थापन:

नोटीस कालावधीत कोणतीही हरकत (objection) प्राप्त झाल्यास, त्यावर विचार केला जातो. जर हरकतींची काही मुद्देसुद योग्य कारणे निघाली, तर त्यावर निर्णय घेतला जातो.

5. साक्षीदार व सत्यता तपासणी:

नोंदणीच्या प्रक्रियेत किमान दोन साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक आहे. या साक्षीदारांना दोन्ही जोडप्यांच्या विवाहाची सत्यता प्रमाणित करणे आवश्यक असते. साक्षीदारांची सही व त्यांची वैयक्तिक माहिती तपासली जाते.

6. प्रमाणपत्र :

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, नोंदणी अधिकारी विवाह प्रमाणपत्र जारी करतो. हे प्रमाणपत्र जोडप्याला त्यांच्या विवाहाच्या कायदेशीर ओळखीचे प्रमाण म्हणून दिले जाते आणि ते भविष्यातील कायदेशीर कार्यांसाठी वापरले जाऊ शकते.

विशेष विवाह कायदा अंतर्गत नोंदणी करण्यामुळे आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहाला कायदेशीर संरक्षण प्राप्त होते, आणि हे प्रमाणपत्र जोडप्याला विविध कायदेशीर, वित्तीय, आणि सामाजिक बाबींमध्ये मदत करतो. 

विवाह नोंदणी प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे (Important Points in the Marriage Registration Process)

1. योग्य कागदपत्रे तयार ठेवणे:

विवाह  नोंदणीच्या प्रक्रियेत योग्य कागदपत्रांची तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शालेय प्रमाणपत्र), ओळख प्रमाण (आधार कार्ड, पासपोर्ट), पत्त्याचा पुरावा (वोटर कार्ड, वीज बिल), आणि विवाहाच्या साक्षीदारांचे तपशील असणे आवश्यक आहे. कागदपत्रांची अचूकता आणि संपूर्णता यामुळे नोंदणी प्रक्रिया जलद व सुरळीत होईल.

2.वेळेत अर्ज सादर करणे आणि तारीख पाळणे:

विवाह नोंदणीसाठी अर्ज योग्य वेळेत सादर करणे महत्त्वाचे आहे. यामुळे नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येत नाही, आणि परिणामी विवाह प्रमाणपत्र लवकर प्राप्त होऊ शकते.

3. साक्षीदारांची महत्त्वाची भूमिका:

विवाह नोंदणी प्रक्रियेत साक्षीदारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दोन्ही जोडप्यांच्या विवाहाची सत्यता प्रमाणित करण्यासाठी साक्षीदारांची आवश्यकता असते. साक्षीदारांनी कायदेशीर कागदपत्रांवर सही केली पाहिजे आणि त्यांची वैयक्तिक माहिती देखील तपासली जाऊ शकते. त्यामुळे, योग्य साक्षीदारांची निवड महत्त्वाची आहे.

सामान्य अडचणी आणि त्यावर उपाय ( Common Problems and Their Solutions )

1. कागदपत्रांचा अभाव

अडचण:

विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असणे ही एक सामान्य समस्या आहे. वय, ओळख, आणि पत्त्याचा पुरावा यामध्ये विसंगती असल्यास अर्ज प्रक्रियेत अडथळे येतात.

 उपाय:

  • अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रांची यादी तयार करून ती पूर्ण करा.
  • हरवलेली कागदपत्रे नवीन मिळवण्यासाठी संबंधित प्राधिकरणात अर्ज करा (उदा., जन्म प्रमाणपत्रासाठी महापालिका).
  • तात्पुरता पत्त्याचा पुरावा म्हणून नोंदणीकृत पत्रिका किंवा प्रतिज्ञापत्र वापरा.

2. अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या चुकांवर उपाय

अडचण:

अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्याने नोंदणी प्रक्रियेला उशीर होतो किंवा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

 उपाय:

  • अर्ज भरण्यापूर्वी माहिती अचूक तपासा.
  • ऑनलाईन अर्ज करताना सरकारी पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांचे पालन करा.
  • शंका असल्यास स्थानिक विवाह नोंदणी कार्यालयात मदत घ्या.

3. वेळेत नोंदणी न झाल्यास काय करावे

अडचण:

विवाह नोंदणीसाठी दिलेल्या  कालावधीत अर्ज न केल्यास दंड किंवा प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता असते.

उपाय:

  • विलंब झाल्यास संबंधित नोंदणी कार्यालयात विलंबाचे कारण स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर करा.
  • अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन घ्या.

4. भाषिक अडचणींवर उपाय

अडचण:

विवाह नोंदणी प्रक्रियेत अर्ज भरताना काही जोडप्यांना सरकारी पोर्टल किंवा फॉर्म्स इंग्रजीमध्ये असल्याने अडचण होते.

उपाय:

  • स्थानिक भाषेत मार्गदर्शन मिळवण्यासाठी अधिकृत विवाह नोंदणी कार्यालयात भेट द्या.
  • अर्ज भरण्यासाठी मदतनीसांची किंवा वकीलांची मदत घ्या.
  • ऑनलाईन अर्जासाठी महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर उपलब्ध स्थानिक भाषेची निवड करा (जर पर्याय असेल तर).

5. साक्षीदारांच्या अनुपस्थितीवर उपाय

अडचण:

साक्षीदार वेळेवर उपलब्ध नसल्यास नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

उपाय:

  • नोंदणीपूर्वी साक्षीदारांची सोय करा आणि त्यांना योग्य माहिती द्या.
  • साक्षीदार म्हणून कुटुंबातील प्रौढ सदस्य किंवा जवळचे मित्र निवडा.
  • जर कोणता साक्षीदार अनुपस्थित असेल, तर त्वरित पर्याय म्हणून इतर पात्र व्यक्तींची व्यवस्था करा.

6. विविध धार्मिक कायद्याची अडचण

अडचण:

प्रत्येक धर्माचे वेगवेगळे विवाह कायदे आहेत, त्यामुळे अर्जदारांना कोणता कायदा लागू होतो, हे समजण्यात अडचण येते.

उपाय:

  • हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, आणि अन्य धर्मांसाठी स्वतंत्र कायदे तपासा (जसे हिंदू विवाह कायदा, 1955; मुस्लिम वैवाहिक कायदे; ख्रिश्चन विवाह कायदा).
  • जर विवाह दोन वेगळ्या धर्मांतील व्यक्तींमध्ये असेल, तर विशेष विवाह कायद्याचा (Special Marriage Act, 1954) आधार घ्या.

7. ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रियेत फसवणुकीपासून सावधगिरी

अडचण:

कधी कधी अर्जदार चुकीच्या मध्यास्थांकडून मदत घेतात, ज्यामुळे फसवणूक किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

उपाय:

  • फक्त अधिकृत सरकारी पोर्टल किंवा स्थानिक विवाह नोंदणी कार्यालयातून अर्ज प्रक्रिया सुरू करा.
  • चुकीच्या मध्यास्थांवर अवलंबून न राहता सरकारी अधिकाऱ्यांकडून थेट मदत घ्या.
  • नोंदणी शुल्क फक्त अधिकृत पावतीवर भरा.

8. नोंदणी प्रक्रियेनंतर प्रमाणपत्र मिळवणे

अडचण:

कधी कधी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यात उशीर होतो.

उपाय:

  • अर्ज प्रक्रियेचा क्रमांक सुरक्षित ठेवा आणि कार्यालयात विचारणा करा.
  • ऑनलाईन अर्ज केल्यास पोर्टलवरून प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची माहिती मिळवा.
  • उशीर झाल्यास विवाह अधिकारी किंवा नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधा.

9. दुरुस्तीची प्रक्रिया

अडचण:

प्रमाणपत्रावर नाव, जन्मतारीख, किंवा इतर माहिती चुकीची नोंदवली गेल्यास दुरुस्तीची आवश्यकता असते.

उपाय:

  • चुकीची माहिती सुधारण्यासाठी संबंधित विवाह नोंदणी कार्यालयात लेखी अर्ज करा.
  • आवश्यक कागदपत्रांसह प्रमाणित प्रतिज्ञापत्र सादर करा.
  • दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन प्रमाणपत्र प्राप्त करा.

समारोप

विवाह नोंदणी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, ती विवाहित जोडप्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारी आणि भविष्यातील कायदेशीर समस्या टाळणारी महत्त्वाची पायरी आहे. महाराष्ट्रातील विविध धर्मांसाठी लागू असलेल्या नियमांनुसार नोंदणी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक बनवण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि अटींचे पालन करून वेळेत नोंदणी करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेविषयी योग्य माहिती मिळवून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यास नोंदणी सहज शक्य होते आणि त्याचे लाभ संपूर्ण आयुष्यासाठी उपयुक्त ठरतात.

RECENT POSTS

CATEGORIES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Life And Law Blogs

Life & law provides valuable insights by simplifying complex legal concepts and connecting them to real-life experiences …read more

Why I write

At Life & law, my mission is simple. to make the law accessible and empower people with knowledge to confidently face life’s challenges …read more

Copyright BlazeThemes. 2025